दत्तवाड / प्रतिनिधी
हिवाळा सुरु झाला की थंडीची हुडहुडी सुरु होते. थंडीबरोबरच धुकं पडायलाही सुरुवात होते.धुक्याची चादर पसरली की आल्हाददायक वातावरण तयार होते. आरोग्यदायक वातावरण वर्षभरासाठी पुरेल इतकी शारीरिक उर्जा हिवाळा ऋतूमध्येच निर्माण होत असते. पण त्याचबरोबर वृध्द,बेघर, बालके,अस्थमाचे रुग्ण यांना मात्र हिवाळा ऋतूमध्ये असह्य होते.आरोग्याबरोबरच वाहतुकीवरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. रस्त्यामध्ये धुक्याची चादर पसरल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने धुक्यात रस्ता हरविल्याचे दिसून येते.छोटे -मोठे अपघात नेहमीच होत असतात.यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तर अनेकांना आपल्या शारीरीक अवयवांना मुकावे लागतात.कित्येकांना अपंगत्व येते. अनेकांचे संसार उघड्यावर पडतात.यासाठी वाहनधारकांनी वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.आपल्याबरोबरच रस्त्यावरील इतरांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.वेगमर्यादेचे उल्लंघन न करता वाहन नियंत्रित करता येईल या पध्दतीनेच वाहन चालविणे काळाची गरज बनली आहे.रस्त्यावर धुके असताना वाहनांचे लाईट लावून रस्त्याचा अंदाज घेवूनच वाहन चालवून सुरक्षित प्रवास करावा.