जुने दानवाड येथील कुमार विद्या मंदिरच्या १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
हेरवाड / प्रतिनिधी
माणूस कितीही मोठा झाला तरी शालेय जीवनातील आठवणी आणि मित्र कधीच विसरता येत नाहीत, याचाच प्रत्यय जुने दानवाड येथे आला. कुमार विद्या मंदिर, जुने दानवाड (ता.शिरोळ) येथील इयत्ता ७ वीच्या १९९८-९९ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.जिव्हाळा,आपुलकी आणि उत्साहाने नटलेला हा स्नेहमेळावा अत्यंत भावूक आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.सरस्वती पूजनाने दिमाखदार सुरुवात या अभूतपूर्व स्नेहमेळाव्याची सुरुवात माता सरस्वतीच्या फोटोपूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी आपल्यातून एक्झिट घेतलेल्या दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री.भगवान शंकर कोळी हे होते.तब्बल पाव शतकानंतर आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना समोर पाहून गुरूजनांचे डोळे कौतुकाने भरून आले होते.स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले.यामध्ये अध्यक्ष भगवान कोळी सरांसह उदय जगदाळे,आप्पासो भोजे गुरूजी, प्रकाश भापकर,जैनूल मुल्ला गुरूजी,अशोक कोकणे आणि चंपाबाई पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकांसोबतच माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.प्रसाद कुलकर्णी,चेतन अंबुपे, संतोष बैरागी,आदिनाथ तिप्पाण्णावर, श्रेयांश पाटील,अनील नांगणुरे,शुभांगी खुरपे,वैजयंती चौगुले,हेमलता पाटील आणि उर्मिला मुके यांनी शालेय जीवनातील गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला,ज्यामुळे काही काळ सर्वजण पुन्हा बालपणात हरवून गेले होते.हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ आठवणींचा संगम नव्हता,तर नव्या मैत्रीची संगत,आपुलकीची साखळी आणि प्रेरणेचा प्रसार करणारा एक अनोखा अनुभव ठरला.कार्यक्रमाचे स्वागत हेमलता पाटील यांनी केले,तर प्रास्ताविक अनील नांगणुरे यांनी मांडले.अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन सुहासिनी बसन्नावर यांनी केले.या मेळाव्याला ३० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.गप्पांच्या फडानंतर सर्व मित्रांनी एकत्र ‘स्नेहभोजनाचा’ आस्वाद घेतला. शिक्षकांना निरोप देताना, “भलेही काळ बदलला असेल, पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हे पवित्र नाते यापुढील काळातही असेच घट्ट टिकवून ठेवू”, असा निर्धार सर्वांनी मिळून केला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रविण वडगावे, फिरोज कुरणे,गुंडूसिंग रजपूत,भरत पाटील,दत्ता कोकणे,बाहुबली चिंचवाडे, हेमलता पाटील आणि उर्मिला मुके यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक वर्षांनंतर जुने मित्र आणि शिक्षक एकत्र आल्याने संपूर्ण परिसरात या स्नेहमेळाव्याचे कौतुक होत आहे.