अब्दुललाट / प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्याला लाभले आहे. खासदार धैर्यशील माने व शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशी विकासाभिमुख लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी असल्याने नक्कीच प्रत्येक गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे अब्दुललाट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, नक्कीच राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार विजयाचा झेंडा नक्की रोवतील, असा विश्वास माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी व्यक्त केला.अब्दुललाट जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड व पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे व नाना उपाध्ये यांच्या यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उल्हास पाटील बोलत होते. अब्दुललाट येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली यानंतर लाटवाडी, हेरवाड, तेरवाड, बस्तवाड, मजरेवाडी व अकिवाट या ठिकाणी प्रचार दौरा संपन्न झाला.या प्रचारा दौऱ्याप्रसंगी बोलताना उल्हासदादा पाटील पुढे म्हणाले ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेपर्यंत काम करत असताना पाठबळाची गरज असते ते पाठबळ राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकासात शाहू विकास आघाडीचे उमेदवार आपले नांव कोरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील जातीयवाद, गटातटाचे राजकारण कायमचे संपावे आणि विकास हा एकमेव अजेंडा असावा,या उद्देशाने आम्ही सर्वपक्षीय राजर्षी शाहू विकास आघाडीची निर्मिती केली आहे.या आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना,सर्व जाती-धर्मातील घटकांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच शाहू आघाडीचा एकमेव ध्येयधोरण आहे.आज विरोधकांकडे शिवीगाळ व टीकेपलीकडे विकासाभिमुख सांगण्यासारखे एकही काम नाही.कोणत्याही चांगल्या उपक्रमाला विरोध करणे हेच त्यांचे धोरण आहे.मात्र जनता आता जागरूक झाली असून विकासाच्या मागे ठामपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा जनता निश्चितच दाखवेल, याबाबत मला कोणतीही शंका नाही.शिरोळ तालुक्याचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. विकासासोबतच सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या तालुक्यातील युवक-युवतींना रोजगारासाठी दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी पाच किलोमीटरच्या परिघात रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने विविध ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचे आमचे नियोजन आहे.आरोग्याच्या क्षेत्रात शिरोळ तालुका लवकरच ‘मेडिकल हब’ म्हणून नावारूपाला येईल, अशी ग्वाही मी देतो. तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, मराठी शाळांमधील शिक्षण हे इंग्लिश मीडियमच्या बरोबरीने, किंबहुना त्याहून पुढे नेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.हे सर्व साध्य करण्यासाठी जनतेच्या पाठबळाची गरज आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जनतेने निवडून दिल्यास, शिरोळ तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा माझा शब्द आहे.असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी रामचंद्र डांगे,अमरसिंह पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.विविध ठिकाणी झालेल्या प्रचार दौऱ्यात विविध गावचे सरपंच,संस्थांची चेअरमन पदाधिकारी राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.