शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले असून, त्यामुळे शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.सत्तांतर घडवून आणण्यासाठी अनेक गट-तट व्यूहरचना करत आहेत.मात्र,या निवडणुकीत शहरातील तीन प्रमुख नेतृत्वांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे तीन नेते म्हणजे गजानन संकपाळ, विजय आरगे आणि निलकंठ उर्फ पिंटू फल्ले.या तिघांनी मागील काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली असून, जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.गजानन संकपाळ हे संयमित व समंजस नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिरोळ शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे विजय आरगे यांनीही कामाच्या माध्यमातून युवकांमध्ये मोठा आधार मिळवला असून, त्यांच्या मतदारसंघातील सक्रिय उपस्थिती त्यांना एक प्रभावी नेता बनवते. तर दुसरीकडे, निलकंठ उर्फ पिंटू फल्ले हे थेट जनतेत राहून कार्य करणारे नेतृत्व मानले जाते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट असल्याने त्यांच्याकडेही अनेक गटांचे लक्ष आहे.या तिघांची कोणत्या गटाच्या पाठिशी उभे राहतात, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, हे तिघे एकत्र आले तर स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. काही राजकीय मंडळी या त्रिकुटाला आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील असून, अंतिम निर्णय कोणत्या गटाला लाभ होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.सध्या शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, जनतेत संवाद साधण्याची प्रक्रिया गती घेत आहे. मात्र, संकपाळ, आरगे आणि फल्ले यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शिरोळवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.