बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा अखंड जयघोष
शिरोळ / प्रतिनिधी
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,श्री राम कृष्ण हरी, श्री विठ्ठल विठ्ठल..जय हरी विठ्ठलचा अखंड जयघोष करीत टाळ मृदुगाच्या गजरात शिरोळ येथून चैत्र वारीसाठी तिर्थक्षेत्र पंढरपुरला वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले.यावेळी शिरोळकरांनी दिंडी मार्गावर सडा रांगोळी घालून व फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत केले.
पंढरपूर येथील चैत्र वारीच्या निमित्ताने गेल्या 11 वर्षापासून शिरोळ येथील उद्योजक ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे, यांच्या कुटूंबियांच्यावतीने स्वखर्चातून वारकर्यांच्या पायी दिंडीचे आयोजन केले जाते. यावर्षीसुध्दा या दिंडीसाठी शिरोळ परिसरातील शेकडो वारकरी सहभगी झाले आहेत.आज सकाळी ह. भ. प. दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी ह.भ.प.महेश कळेकर (सर) यांच्या व मान्यवरांच्या हस्ते विणा पूजन, पालखी पूजन व आरती होवून मान्यवरांच्या उपस्थितीत या दिंडीचे प्रस्थान झाले.
यावेळी येथील श्री हनुमान मंदिर गावडे गल्ली, श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, चौकातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर येथे आरती होवून ही वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. वारकऱ्यांच्या पायी दिंडी प्रस्थानसमयी शहरातील नागरिकांनी रस्त्यावर सडा मारून, रांगोळी काढून पुष्पवृष्टी करत वारकर्यांचे स्वागत केले. मनोभावी पालखीचे पूजन करून या दिंडीला शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव,संजय उर्फ संभाजी चव्हाण,पत्रकार चंद्रकांत भाट,माजी आमदार उल्हास पाटील,माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख,युवा नेते किरण गावडे, उल्हास उत्तमराव पाटील, सुनील पोळ, सर्जेराव कांबळे, यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक यांनी पायी दिंडीला शुभेच्छा दिल्या.
या पायी दिंडी सोहळ्याचे ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, सुनिल इंगळे, अनिल इंगळे, गुरूप्रसाद इंगळे, दिगंबर इंगळे धैर्यशील इंगळे, व इंगळे परिवारातील सदस्यांनी उत्कृष्ट आणि नेटके नियोजन केले आहे.तर किरण ताराप- माने, सर्जेराव माने, विलासराव गावडे, संपत जाधव, अशोक इंगळे, अमरसिंह जगदाळे,शंकर गावडे, भरत रोडे, तानाजी माने, संग्राम माने, आप्पासाहेब हंकारे, प्रगतशील शेतकरी हैबतराव जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.शिरोळातील शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत.
बोला पुंडलिक वरदे,हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम,पंढरीनाथ महाराज की जय,राम कृष्ण हरी श्री विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर करत टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.प्रत्येक दिवशी दिंडीच्या मुक्काम स्थळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांचे किर्तन व प्रवचनाचे आयोजनही करण्यात आले आहे.गेल्या अकरा वर्षापासून या दिंडी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या इंगळे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.