विकासाभिमुख केंद्रीय अर्थसंकल्प – डॉ.अरविंद माने

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‌जाहीर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प खरोखरच विकासाभिमुख आहे.केंद्र सरकारने कृषी,लघु व मध्यम उद्योग,गुंतवणूक व निर्यात हे प्रगतीचे चालक,घटक मानले असून,त्यात भरीव व दूरगामी परिणाम घडवणारी पावले टाकली आहेत.तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे देशाची प्रगती होणार आहे. असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने डॉ.अरविंद माने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन नक्कीच उंचविणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून नव्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा फायदा कमी कृषी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांतील १.७० कोटी शेतकऱ्यांना होईल व कृषी उत्पादन वाढेल. डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच फळे व भाज्या आणि कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आखलेली दीर्घकालीन योजना स्वागतार्ह आहे. लघु व मध्यम उद्योजकांना विनातारण हमी कर्ज साह्य पाच कोटी रुपयांवरुन वाढवून दहा कोटी रुपये करणे आणि महिला तसेच अनुसूचित जाती व जमाती गटांमधील प्रथमच उद्योजक बनणाऱ्यांना पुढील पाच वर्षांत दोन कोटी रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज देणे या योजनांमुळे उद्योजकतेत नक्कीच वाढ होईल. तरुणांमध्ये जागतिक दर्जाच्या कौशल्य विकासासाठी पाच नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करणे, खासगी क्षेत्राला संशोधन, विकास व अभिनवता पुढाकार राबवण्यासाठी २० हजार कोटींच्या निधीची तरतूद करणे आणि निर्यात वाढीला उत्तेजन देण्यासाठी देशी उद्योगांना साह्य व प्रोत्साहन देणे, ही सरकारची पावले नक्कीच कौतुकास्पद आहेत.तसेच सर्वसामान्यांसाठी तात्काळ जलद रेल्वे सुविधा मिळावी यासाठी निधीची तरतूद करून नव्या रेल्वे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना १२ लाखापर्यंत कर सूट देऊन त्यांचा हीत साधण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणि विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांचे या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याने देशाची प्रगती होणार आहे असेही शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!