डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नृसिंहवाडीत स्वच्छता मोहीम; १४ टन कचऱ्याचे संकलन

Spread the love
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवार व रविवार असे दोन दिवस दत्त जयंती सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे ठिकठिकाणी कचरा जमा झाला होता.मात्र रेवदंडा (जि. रत्नागिरी) येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला असून आज सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहिमेद्वारे सुमारे १४ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ६५० ‘श्री’ सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. दत्त मंदिर परिसर, सर्व प्रमुख रस्ते, व्यापारी पेठ परिसर, बनभाग परिसर, स्मशानभूमी परिसरात अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी,डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. दत्त मंदिर घाट परिसरात मोहिमेचा समारोप करण्यात आला.धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी यांनी सांगितले.यावेळी सरपंच चित्रा सुतार,उपसरपंच रमेश मोरे,रमेश सुतार,

दत्तात्रय चव्हाण, रमेश सुतार, दर्शन वडेर व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!