कागल तालुक्यातील आनूर-बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज (दि.१७) दुपारी घडली.बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर एकाचा शोध सुरू आहे.आनूर व बस्तवडे ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीनजणांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं सर्व गावावर शोककळा पसरली आहे.
आणुर गावाच्या यात्रेसाठी हे सर्वजण पाहुण्यांच्या घरी आले होते.हे सर्वजण नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर दुपारी यातील चौघांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेल्यांमध्ये जितेंद्र विलास लोकरे (वय ३६ मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय ३४ अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय २७ रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय १७, अथणी, कर्नाटक) यांचा समावेश आहे.
दुपारी तीनच्या सुमाराला घडलेल्या या दुर्घटनेची माहिती साडेतीनच्या दरम्यान आनूर व बस्तवडे या गावांमधील कार्यकर्त्यांनी दिली.परदेश दौऱ्यावर स्पेनमध्ये असल्यामुळे मी तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार अमर वाकडे यांच्याशी संपर्क साधला.
स्थानिकांनी शोधाशोध करूनही लहान मुलगा कु. हर्ष दिलीप येळमल्ले रा. अथणी याचा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रेस्क्यू फोर्सच्या टीम पाच वाजता
नदीवर पोहोचल्या व त्यांनी शोध कार्य सुरू केले. तसेच; मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री.येडगे व तहसीलदार श्री. वाकडे यांना दिल्या.