हेरवाड / प्रतिनिधी
तेरवाड बंधाऱ्यावर जलपर्णीच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे.ही जलपर्णी तातडीने हटवण्यासाठी आता प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जलपर्णी सात दिवसात हटविण्याचे निर्देश संबंधिताना दिले होते.मंगळवार पासून तेरवाड बंधारा येथे जलपर्णी काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.एक जेसीबी,चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने जलपर्णी काढणेत येत आहे.इचलकरंजी प्रोसेस असोसिएशन,तेरवाड ग्रामपंचायत व पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष, स्वाभीमानी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांचे वतीने ही मोहिम राबविणेत येत आहे.बंडू पाटील यांनी स्वतःचा ट्रॅक्टर देवून,स्वतः मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. दरम्यान मंगळवारी तेरवाड बंधाऱ्यावर टाकवडे चे सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले,धरणगुत्तीचे शेखर पाटील,नांदणीचे निशांत निटवे,राजगोंडा पाटील,तानाजी वठारे,यड्राव चे रमेश माने,विश्वास बालिघाटे,इचलकरंजी प्रोसेस असोसिएशनचे संचालक मंडळ,मारुती पन्हाळकर,संदीप वनकुंद्रे,दिलीप शिरढोणे यांनी भेट देवून पाहणी केली.पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीच्या वतीने नदीकाठच्या सर्व नागरिकांना,सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेमुळे पंचगंगा नदी लवकरच जलपर्णीमुक्त होईल,अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.