आज शिरोळ बरोबर संपूर्ण तालुक्यात रास्ता रोको आंदोलन.
आरक्षणासाठी मराठा समाजाने बांधली वज्रमुठ
शिरोळ / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करून मराठा समाजाची वज्रमुठ बांधली आहे. मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र शासनाने आरक्षणासंदर्भात दिलेला शब्द पाळला नाही. फसवणूक केली या कारणास्तव पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 23 रोजी शिरोळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शनिवार दि. 24 रोजी सकल मराठा समाजाने आपापल्या गावात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्याचे ठरले. त्यानुसार शिरोळ सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. रास्ता रोकोचा निर्णय घेत असताना सध्या, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या परीक्षेचा व वेळेचा विचार करून सर्वत्र रास्ता रोको शांततेत आणि संयमाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला शिरोळ तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रमुख सागर धनवडे, डॉ. अतुल पाटील, वसंत जाधव, राहुल यादव, बापूसो गंगधर, विजय काळे, अमर पाटील, गोवर्धन माने, गोपाळ चव्हाण, जगन्नाथ भीमराव, अनिल पाटील, नंदकुमार नाईक, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव, धनाजी पाटील नरदेकर,दरगू गावडे, बजरंग काळे, धीरज शिंदे, विजय चव्हाण, पांडुरंग माने, शक्तीजित गुरव, विनोद मुळीक यांच्यासह सकल मराठा समाजाचे समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.