शिरोळ / प्रतिनिधी
मौजे आगर गावातील सोसायटी परिसरात जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पाणपोई उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना विशेषतः पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासत असताना या उपक्रमामुळे परिसरातील रहिवासी, तसेच येणारे-जाणारे वाटसरू आणि विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या सोसायटी परिसरातून अनेक विद्यार्थी दररोज कॉलेजसाठी ये-जा करतात. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने सतत पाणी पिणे अत्यावश्यक झाले आहे. ही गरज ओळखून दुर्गा सहेली ग्रुपने पुढाकार घेत पाणपोईची सोय उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत आहे.या स्तुत्य उपक्रमासाठी ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ. अश्विनी नरूटे यांचे विशेष सौजन्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम प्रत्यक्षात साकार होऊ शकला. या वेळी फेडरेशन उपाध्यक्षा डॉ. सौ. स्नेहल कुलकर्णी, ग्रुपच्या अध्यक्षा शर्मिला देशपांडे, माजी अध्यक्षा सौ. संगीता जाधव तसेच सौ. नलिनी देसाई, सौ. अनुराधा वेल्हाळ आणि सौ. कुसुम जगदाळे या मान्यवर उपस्थित होत्या.परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, अशा सामाजिक जाणीवेतून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले. दुर्गा सहेली ग्रुपने घेतलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.