पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची, नागाव, मौजे वडगाव , शिये , हालोंडी आणि हेरले परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यांनंतर आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा आणला असला, तरी शेतीचे मात्र मोठे नुकसान केले आहे. परिसरातील शाळू ( ज्वारी ) , गहू , मका ही पिके सध्या काढणीच्या हंगामात असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले या पावसामुळे काडणीला आलेला शाळू , मका , गहू भिजला असून, हे धान्य आता काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे उत्पादनात घट तर होईलच, शिवाय बाजारभावही कमी मिळण्याची शक्यता आहे.एकीकडे कडधान्य आणि इतर पिकांचे नुकसान झाले असताना, दुसरीकडे हा पाऊस ऊस पिकासाठी मात्र फायदेशीर ठरणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे सुकू लागलेल्या ऊसाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे आणि गारपिटीमुळे सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रस्त्यावरून चालणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.मोठ्या कष्टाने शेतकर्यानी पिकवलेली शेती एका पावसाने सर्व मातीमोल झाले,” अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.