जयसिंगपूर / प्रतिनिधी
अर्जुनवाड परिसरातील नागरिकांच्या आंदोलनानंतर बंद करण्यात आलेल्या मे अरिहंत यार्न प्रोसेसर्स प्रा.लि.या कारखान्याने परवानगीशिवाय पुन्हा उत्पादन सुरू केल्याचे शनिवारी (दि.१४ मार्च) दुपारी उघडकीस आले. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ आंदोलनाचा इशारा देत संबंधित कारखान्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.यापूर्वी दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्जुनवाड ग्रामस्थांनी ल.क. अकीवाटे औद्योगिक सहकारी वसाहतीतील उद्योगांच्या सांडपाण्याच्या समस्येमुळे तीव्र उद्रेक केला होता.त्यानंतर मे अरिहंत यार्न प्रोसेसर्स प्रा.लि.गट नं.१०४९, प्लॉट नं.७९ ते ८२ या कारखान्याचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते.मात्र प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत कारखान्याने परस्पर वीज कनेक्शन सुरू करून उत्पादन सुरू केल्याचे आज निदर्शनास आले.ही बाब समजताच अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ल.क. अकीवाटे औद्योगिक सहकारी वसाहत लि., अकीवाटे जयसिंगपूर येथे धाव घेत संबंधित कारखान्याविरोधात तक्रार दिली.तक्रारीची गंभीर दखल घेत संस्थेने तत्काळ कारवाई करत मे अरिहंत यार्न प्रोसेसर्स प्रा.लि.या कारखान्याच्या गेटला ताळे ठोकून कारखाना बंद केला.संस्थेकडून कारखानदाराला स्पष्ट इशारा देण्यात आला असून,संस्थेची परवानगी न घेता कारखाना सुरू केल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असे लेखी आदेश देण्यात आले आहेत.या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान,याचवेळी सुरू असलेल्या प्रोसेसला ल क अकीवाटे इंडस्ट्रीकडून सील ठोकण्यात आले.या कारवाईवेळी अकीवाटे इंडस्ट्रीच्या चेअरमन मेघा कुलकर्णी,संचालक दिलीप पाटील कोथळीकर,मॅनेजर मुल्ला, अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे,राकेश खोत,अमोल लाटवडे,प्रकाश झांबरे,रमेश झाबरे, उद्धव मगदूम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.