दत्तवाड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असलेल्या काळात दत्तवाड मतदार संघातील नागरिकांकडून मटका व तीन पानी जुगार अड्डे निवडणूक काळासाठी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातून ही मागणी वाढली असून,मतदारसंघात निवडणूक दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सक्रिय कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दत्तवाड मतदार संघ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मटका व तीन पानी जुगार खेळ होतात.यामुळे या अवैध खेळांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून,कर्नाटक राज्यातूनही अनेक खेळाडू येथे येत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. नागरिकांना या काळात विविध आमिष दाखवून मतदानावर परिणाम होऊ नये,यासाठी अवैध धंद्यांवर अंकुश लावणे आवश्यक आहे,असा नागरिकांचा उद्देश आहे.त्यामुळं पोलीस प्रशासनाने मतदारसंघातील मटका व तीन पानी जुगार अड्ड्यांवर तात्पुरती बंद करण्याची मागणी केली आहे. निवडणूक काळात अवैध खेळ सुरू राहिले तर सामाजिक व कायदेशीर दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे,पोलीस प्रशासनाने स्थानिक पातळीवर कठोर कारवाई करून या प्रकारावर पूर्ण लक्ष ठेवावे,अशी विनंती करण्यात आली आहे.दत्तवाड येथील स्थानिक प्रशासनाने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक ती कारवाई करून निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सक्रियतेने या अवैध खेळाडूंच्या अड्ड्यावर नजर ठेवावी, असे नागरिकांचे मत आहे.