शिरोळ / प्रतिनिधी
मराठा समाजासाठी कोल्हापुरात मिळणारी सुमारे शंभर कोटी रुपयांची जमीन राजकीय दबाव टाकून एका गृह निर्माण संस्थेला कवडीमोल दराने देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात मोठे राजकारण तापले होते.व्यवहाराची चर्चा सध्या शिरोळ शहरातील प्रत्येक चौकात रंगली आहे.या व्यवहारामागे स्थानिक पातळीवर प्रचंड मोठ्या राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याने नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये संताप वाढताना दिसत आहे.एकीकडे जमीन हडप केल्याच्या आरोपांना तोंड देत असताना,याच नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारतो म्हणून मते मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पुतळ्याच्या नावाखाली जनभावनांना साद घालायची आणि दुसरीकडे समाजाच्या हक्काची जमीन गुपचूप आपल्या संस्थेला कवडीमोल दराने द्यायची,हे दुटप्पी धोरण कसे स्वीकारायचे?” असा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत.दरम्यान, शासकीय अनुदानांचा गैरवापर करून मोठे उद्योग उभारले या उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार न देता मोठ्या प्रमाणावर बाहेरील बिहारी कामगारांना कामावर ठेवण्यात येत असल्याची नाराजीही जनतेत वाढत आहे.स्थानिक तरुणांना रोजगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे यावेळी अशा नेत्यांना मतांनी घरचा रस्ता दाखवा अशी मोहीम स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे.शिरोळ तालुक्यातील मतदार यावेळी विकासाच्या नावाखाली वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे वातावरण आहे.शहरात सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत शिरोळचे मतदार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.