शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेले आंदोलन शनिवारी मध्यरात्री उग्र झाले आहे.परवडणारा दर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गनिमी कावा करत कुरुंदवाड, मजरेवाडी,बस्तवाड आणि तेरवाड परिसरात अनेक ऊसवाहतूक करणारी वाहने पेटवून दिली.काही ठिकाणी वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचा आरोप आहे की,कारखान्यांकडून परवडणारा दर न देता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे.याविरोधात शेतकरी काही दिवसांपासून शांततेत आंदोलन करत होते.मात्र,आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याला कारखान्याच्या संबंधितांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर उस उत्पादकांमध्ये प्रचंड रोष उसळला.त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरा विविध ठिकाणी उसाची वाहने पेटवून दिल्याची मिळाली. शेतकऱ्यांचा आरोप आहे की,पोलिस यंत्रणा कारखान्यांच्या बाजूने वागत असल्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, ऊस दराचा प्रश्न चर्चेतून निकाली काढावा, अन्यथा आंदोलन नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणून समाधानकारक दर जाहीर करावा, अशी मागणी वाहनधारक आणि उस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.