शिरोळ / प्रतिनिधी
नृसिंहवाडी येथील हॉटेल मंगलममध्ये कार्यरत असलेले श्रीमंत चव्हाण या कर्मचाऱ्याचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान दिनांक १७ जून २०२४ रोजी मिरज येथील भारती हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.चव्हाण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधी योजना सुरु केली होती.या योजनेचा मोठा लाभ त्यांच्या कुटुंबाला मिळाला आहे.हॉटेल मंगलमचे दिवंगत मालक स्व. अशोक पुजारी गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार, संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ (भविष्य निर्वाह निधी) सुरू केला होता.दोन वर्षे केंद्र सरकारकडून २४% निधी भरून घेण्यात आला. यानंतर मालक व कर्मचारी यांच्या माध्यमातून नियमित पीएफ भरला गेला.चव्हाण यांच्या निधनानंतर रमेश मिठारे यांनी तातडीने पुढाकार घेत चव्हाण यांच्या नातेवाइकांचा संपर्क शोधून काढला.सुरुवातीला संपर्क करणे कठीण गेले, मात्र सातत्याने प्रयत्न करून त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. मग स्वतः त्यांच्या गावी जाऊन मयताच्या पत्नी व मुलींच्या सह्या घेऊन सर्व कागदपत्रे कोल्हापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सादर केली.यामध्ये मृत्यू दावा (डेथ क्लेम) अंतर्गत कुटुंबाला विमा रक्कम रुपये ५,२७,२२८/-, पीएफ रक्कम रुपये १,०३,६८७/- व पेन्शन रक्कम (जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२५) एकूण रुपये ६४,८३५/- अशी एकूण रुपये ,९५,७५०/- जमा झाली. तसेच पुढे दरमहा पत्नीला रुपये २८०१/-, मोठ्या मुलीला रुपये ७००/- व धाकट्या मुलीला रुपये ७००/- अशी पेन्शन मिळणार आहे.या प्रक्रियेत भविष्य निर्वाह निधीचे श्री.बनजवाडे, श्री.धर्माधीकारी, हॉटेलचे सध्याचे मालक श्री.हर्षंद पुजारी, मॅनेजर स्नेहन नंदगावे, श्री.शशिकांत कोडणिकर व श्री.शहानुर शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.कुटुंबीयांनी मिळालेल्या या आर्थिक आधारामुळे आनंद व्यक्त करत रमेश मिठारे यांचे विशेष आभार मानले असून, त्यांच्या समाजहिताच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.