शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे. यासह विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी शिरोळ नगरपरिषद प्रशासन व आंदोलकांच्या मंगळवारी दोन बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नसल्यामुळे सदरची बैठक निष्फळ ठरली.आंदोलकांच्या मागण्यांबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही.तोपर्यंत सदरचे आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल असा इशारा युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रशासनाला दिला.
शिरोळ शहरातील नागरिकांना वेळेत आणि नियमित शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे. अपूर्ण असलेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी. यासह विविध मागण्यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या शिवाजी चौकात मंगळवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू झाले आहे.
आंदोलनस्थळी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे, बांधकाम अभियंता श्रीधर डुबुले, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील, अविनाश नाईक, कार्यालयीन निरीक्षक संदीप चूडमुंगे यांच्या शिष्टमंडळाने दोनदा आंदोलकांची भेट घेतली. या भेटीत आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आंदोलकांच्या मागण्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. पण सदरची बैठक निष्फळ ठरली. यामुळे शहरातील नागरी प्रश्नासाठी, आणि जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी. याकरिता ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन येणाऱ्या काळात तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी या बैठकीदरम्यान नगरपरिषद प्रशासनाला दिला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, इम्रान आत्तार, माजी ग्रा. प. सदस्य धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, आनंदराव माने देशमुख, आप्पासाहेब गावडे, रावसाहेब माने, कृष्णा भाट, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट, भालचंद्र ठोंबरे, सिताराम शिंदे, यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला शिरोळकर नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
तसेच शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना विविध गावचे सरपंच लोकप्रतिनिधी यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन शिरोळकरांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.