पुलाची शिरोली / प्रतिनिधी
कुबेर हंकारे
जंगलातील मानवी हस्तक्षेप,अतिक्रमण आणि वणव्याच्या घटना घडत असल्यामुळे वन्यप्राणी गाव भागात व ऊसाच्या शेतात वावरत असल्याचे मत करवीरचे वन क्षेञपाल रमेश कांबळे यांनी व्यक्त केले.ते गुरुवारी नागाव येथे बिबट्याच्या पिलाचा होरपळून मृत्यू झाला होता.त्यासंदर्भात पुढील तपासणी साठी आले होते.यावेळी त्यांनी नागावचे लोकप्रतिनिधी व शेतकरयांना मार्गदर्शन केले.बुधवारी नागाव येथील गाडीवड परिसरातील अमित चिंतामणी सोळंकुरे यांच्या शेतामध्ये बिबट्याचा पिलाचा ऊसाचा फड पेटविलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.त्या अनुषंगाने वनविभागाकडून ड्रोन द्वारे बुधवार पासून बिबट्याचा शोध सुरू केला आहे.तसेच गुरुवारी दुपारी वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या ठश्यांची परिसरातील शेतात पहाणी केली.तसेच हे बिबट्याचे पिल्लू एक दोन दिवसांत जन्मले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.या मादी बिबट्याची प्रसूती या परिसरात होवून तिने आणखीन तीन चार पिलांना जन्म दिला असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
नुकत्याच जन्मलेल्या या पिलाचा मृत्यू झाल्याने या पिलाच्या शोधात मादी बिबट्या परत येण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे वनविभागाने कालपासून एक पथक तैनात केले असून ड्रोन च्या साहाय्याने या बिबट्याचा शोध सुरू केला आहे.अजून दोन दिवस ड्रोन च्या साहाय्याने पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाताना बॅटरी घेऊन मोबाईलवर गाणी लावून जावे, जेणेकरून हे प्राणी दुसरीकडे जातील.बिबट्या,गवा, रानडुक्कर,भेकर असे जंगली प्राणी आढळल्यास ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनक्षेत्रपाल रमेश कांबळे तसेच नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. विमल शिंदे यांनी नागरिकांना सावधानता व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी वन अधिकारी रमेश कांबळे,वनपाल एम. एस. पोवार, वनसेवक बाबासाहेब जगदळे विनायक आळवेकर आदी शेतकरी उपस्थित होते