छत्रपती शिवाजी विद्या मंदिर आवारातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा : कोळी
शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर नं. 3 या शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.सोमवारी सकाळी पालकांच्या उपस्थितीतच कुत्र्यांनी विद्यार्थ्यांच्यावर हल्ला केला असता उपस्थितीतांनी प्रसंगावधान दाखवल्याने त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला यामुळे या भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फ दिवाण कोळी यांनी शिरोळ नगर परिषदेकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी विद्या मंदिर शाळेच्या परिसरात आणि खेळाच्या मैदानामध्ये नियमित दहा-पंधरा कुत्र्यांचा कळप वावरत आहे.येथील स्वच्छतागृह मुतारी या ठिकाणीही काही कुत्री बसलेली असतात विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता सोडण्यात आले असल्यास विद्यार्थ्यांच्यावर कुत्री धावून येत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये कुत्र्यांची दहशत वाढली आहे.त्याचप्रमाणे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
शाळेत प्रवेश करत असताना विद्यार्थ्यांच्यावर अंगावरती कुत्री हल्ला करीत आहेत.यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्याअगोदर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.या शाळे शेजारी सुरू असलेल्या कत्तलखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री एकत्र येत आहेत.कुत्र्यांचा कळप पाहून मोठ्या माणसांच्यातही भीती निर्माण झाली आहे.
यामुळे या परिसरात सुरू असणारा कत्तलखाना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.शालेय परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिरोळ नगर परिषदेकडे वारंवार करण्यात आली आहे.मात्र नगरपरिषदेमधून या संदर्भात कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे नगरपरिषदेच्या कारभाराबाबत पालकांच्यामधून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी शाळेत एका पालकांच्या उपस्थितीत कुत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर धाव घेतली.संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना धारेवर धरले.एखाद्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये जीव जाऊ शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुत्र्यापासून संरक्षण मिळावे याकरिता ठोसो उपाय योजना करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केला असून नगरपालिकेने तात्काळ या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.अन्यथा नगरपरिषदेच्याविरोधात पालकांच्या समवेत आंदोलन करण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप उर्फ दिवाण कोळी यांनी दिला आहे.