सोनार्लीकरांचा चाळीस वर्षांचा वनवास अखेर संपला
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरण प्रकल्पातील विस्थापित झालेले सोनार्ली धरणग्रस्त हे गाव सन १९८५ साली पेठ वडगाव शेजारी वसवण्यात आले आहे. सोनार्ली हे गाव विस्थापित होऊन जवळ-जवळ ४० वर्षे पूर्ण होत आहेत.
या विस्थापित गावाला आजही सर्व प्रकारच्या प्रशासकीय मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. कारण या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय नव्हते.या गावातील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मूलभूत हक्कासाठी शासन दरबारी त्यांनी आपला लढा सुरु केला.
गावच्या सेवा सुविधा व ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासन दरबारी मोर्चे,अंदोलनाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत होते.ग्रामस्थांच्या या लढ्याला माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही पाठबळ दिले.
२०२१-२२ साली सोनार्ली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी बाबतचा प्रस्ताव शसन दरबारी दाखल झाला. शासनाच्या विविध विभागातून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत माजी आमदार अमल महाडिक यांनी हा लढा यशस्वी केला.दि.७ मार्च २०२४ रोजीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात सोनार्ली ग्रामपंचायत मंजुरीची अंतिम अधिसूचना प्रसारित झाली आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयाचा हा लढा यशस्वी करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विलास सोनावणे,कौशिक आनंद,संतोष गोटल,बाळू पाटील,अकबर पन्हाळकर(सर),पांडुरंग लाखन,काशिनाथ घोलप,सुलेमान पन्हाळकर,पिरमहमद पन्हाळकर,किरण कांबळे,अंकुश घोलप,पांडुरंग कोठारी, ॲड.दिनेश घोलप,चंद्रकांत य.घोलप,उस्मान पन्हाळकर, काळू सकपाळ यांचे सहकार्य लाभले.