औरवाड येथील नवविवाहित कोले दाम्पत्यांनी घातला आदर्श
लग्न सोहळ्यातील अक्षता ऐवजी केले वृद्धाश्रम व अनाथाश्रमात अन्नदान ,केली गोमातेची सेवा
औरवाड येथील प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत कोले यांचे चि.प्रीतम कोले व बोरगावचे बाबासाहेब पाटील यांची कन्या भक्ती पाटील यांच्या लग्न सोहळा निमित्त त्यांनी एक नवा आदर्श घातला.लग्न सोहळ्यामधील ज्या अक्षता म्हणून तांदळाचा उपयोग होतो ते फेकून दिल्याने अन्नाची नासाडी होते हे होऊ नये म्हणून त्यांनी तो तांदूळ जानकी वृद्धाश्रम घोसरवाड व बालोद्यान अनाथाश्रम अब्दुललाट येथे जाऊन त्यांच्या एकवेळच्या जेवण बनवण्यासाठी तांदूळ, रवा, जेवणासाठीचे इतर साहित्य दिले.तसेच नृसिंहवाडी येथील गो शाळेत जाऊन गोमातेस आहार दान व त्यांची सेवा केली.यावेळी जयवंत कोले व सौ.पद्मजा कोले म्हणाले की नेहमी आम्ही इतरांच्या लग्न सोहळ्यासाठी जात असतो.त्यावेळेला एक गोष्ट आमच्या नजरेस पडत होती ती म्हणजे लग्न सोहळ्यामध्ये अक्षदा म्हणून तांदळाचा उपयोग व्हायचा,लग्न समारंभ पार पाडल्यानंतर ही अक्षदा तांदूळ याची नासाडी व्हायची.ही नासाडी आम्हाला चैन बसू देत नव्हती,कसे करायचे लोकांना कसे समजावून सांगायचे ही खंत नेहमी मनामध्ये राहायची पण स्वतःच्या मुलाच्या लग्नात हा बदल केला.लग्न सोहळ्यामध्ये अक्षदासाठी तांदळाचा उपयोगच केला नाही. आलेल्या सर्व लोकांना तांदूळ अक्षदा म्हणून दिल्या नाहीत.तोच तांदूळ व जेवणासाठी चे इतर साहित्य वृद्धाश्रम,अनाथ आश्रम येथे देण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपताना काही परंपरागत रितीरिवाजामध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक असते हा बदल आपल्यापासून करताना मनाची तयारी खूप भक्कम हवी असते.ती तयारी या पालकांनी दाखवली.या दीडशे कोटीच्या लोकसंख्येच्या देशामध्ये अशा या सोहळ्यांमधून अक्षदाच्या रूपामध्ये तांदळाची किती नासाडी होत आहे.याचा विचार करणे काळाची गरज आहे कित्येक लोक उपाशीपोटी अर्धपोटी झोपी जात असतात आणि आपण या आपल्या कार्यामध्ये अशा पद्धतीने अन्नाची नासाडी करतोय याचा प्रामुख्याने विचार होणे हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.यासाठी नवदांपत्यानेही त्याला होकार दिला व शिरोळ तालुक्यामध्ये एक नवा आदर्श उभा केला.त्यांच्या या सामाजिक कार्याचे शिरोळ तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.