कुंभोज / विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकणंगले येथील गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न कधी निकाली लागणार ,याकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधले असून गेल्या वर्षी हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मध्यस्थीने सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे सुरू झाले होते.पण तेथील काही शेतकऱ्यांच्या वादग्रस्त परिस्थितीमुळे ते काम पुन्हा एकदा रखडले असून सदर शेतकऱ्यांची मध्यस्थी करून शासनाने व कुंभोज ग्रामपंचायतच्या पदाधिकांनी तात्काळ बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थ तसेच ग्रामस्थांच्यातून होत असून,
बायपास रस्त्या नसल्याने कुंभोज मध्ये वाहतूक करत असताना अनेक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी तासनतास जाम होणारे ट्राफिक व त्या ट्राफिक मध्ये काल माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही तब्बल एक तास पेक्षा जास्त सदर वाहतूक समस्येचा सामना करावा लागला, परिणामी अशा रोज अनेक विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांना अशाच पद्धतीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कुंभोज व शासनाने तात्काळ सदर गोष्टीची पाठपुरावा करून कुंभोज बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सध्या चालू असलेली ऊस वाहतूक व अवजड वाहनांची वाहतूक बायपास रस्त्याने सुरू करावी अशी मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत आहे.
इतर गोष्टीसाठी सतत आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कुंभोज बायपास रस्ता, तसेच गावातील शासकीय जागेवरती असणाऱ्या विविध समस्येवरती का बोलत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांत सध्या व्यक्त होत असून कुंभोज मधील प्रत्येक समस्येला राजकीय वळण प्राप्त होते व प्रत्येक कामात खोडवा घातला जातो अशा आशयाचे मत नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे. सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील अग्रेसर असल्याचे चित्र दिसत आहे.