नांदणी येथील पंचगंगा नदी पात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रात मृत माशाचा खच पडला आहे.परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर कारवाईची
मागणी होत आहे.वारंवार पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ होत असल्याने प्रदूषण महामंडळाच्या गलथान कारभाराच्या विरोधात तालुक्यातील जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे.पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे असून देखील त्यांनीही पंचांगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी आज तीव्र संताप व्यक्त होत आहे.पंचगंगा नदीत प्रतिवर्षी दिवाळीनंतर प्रामुख्याने नदीतील प्रदुषणाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो.दुषित पाण्यामुळे माशांबरोबर जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात.हेच पाणी शेतीला पुरविले जाते. गेली २० ते २५ वर्षे पंचगंगा नदी प्रदुषणाचा मुद्दावर आम्ही लढा देत आहोत मात्र ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.सध्या शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्रात काळपट आणि दुर्गंधीयुक्त रसायन मिश्रित दूषित पाणी आले आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी तेरवाड येथील बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला होता.अशातच आता गुरूवारी नांदणी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडल्याने नदीकाठावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परसली आहे.वेळीच उपाययोजना न झाल्याने तालुक्यात रोगराईचे थैमान होईल अशी भीतीही बालीघाटे यांनी व्यक्त केली.