तेरवाड / प्रतिनिधी
तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीच्या बंधाऱ्यावर काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला असून मृत माशांचा खच साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील तेरवाड बंधाऱ्यावर दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी आले होते.यावेळी,स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील,विश्वास बालीघट्सह शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन केले.जोपर्यंत प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई केली जात नाही,तोपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेत प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना तीन तास डांबून ठेवले.बंडू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रदूषणासाठी जबाबदार घटकांवर तातडीने कारवाईची मागणी केली.दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाची उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी प्रदूषित पाण्याचा सविस्तर अहवाल प्राप्त करून प्रदूषित घटकावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवळली.त्यानंतर मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांची मुक्तता करण्यात आली.पंचगंगा नदीत मृत मासे मिळून आल्याने या ठिकाणी प्रत्येक वेळी पाण्याचे नमुने घेऊन जाणारे अधिकारी कोणताच अहवाल देत नाहीत की कार्यवाही करत नाहीत शासन गांधाऱ्याची भूमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी आणि पंचगंगा नदीवर आधारित असणाऱ्या पाणी योजनेच्या गावातील ग्रामस्थातून उपस्थित होत आहे.
यावेळी बोलताना बंडू पाटील म्हणाले की पंचगंगा नदी प्रदूषित करून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाची निष्क्रियता असह्य आहे. जर कायमस्वरूपी उपाययोजना राबवल्या नाहीत आणि जबाबदार घटकांवर कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. लोकांचा संयम संपत चालला आहे.अंत पाहू नका असे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.या घटनेमुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई आणि प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाला सतर्कतेची विनंती करत या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची मागणी केली.