कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरात गेल्या अनेक दशकांपासून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या श्री. कृष्णावेणी माता महाशिवरात्री यात्रेचे नियोजन पुन्हा मोठ्या उत्साहात सुरू करण्याची मागणी सर्व पक्षीय कुरुंदवाड शहर कृती समितीने निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे केली आहे.दरम्यान प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी म्हणाल्या महाशिवरात्री यात्रा ही कुरुंदवाड शहराची परंपरा आणि श्रद्धेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या यात्रेचे आयोजन पुन्हा मोठ्या उत्साहात सुरू करण्यासाठी नगरपरिषद वचनबद्ध आहे. स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून व त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे सांगितले.महाशिवरात्री यात्रा ही कुरुंदवाड शहराची ओळख असून, प्राचीन परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी अडथळे निर्माण केल्याने यात्रा भरणे कठीण झाले होते. यंदा, 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या यात्रेसाठी नियोजन करण्यासाठी आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.असे मत माजी नगरसेवक राजू आवळे,बाबासाहेब सावगावे,तानाजी आलासे,सुनील कुरुंदवाडे यांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासमोर पालिका दालनात बोलविण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.यावेळी पुढे बोलताना कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले यात्रा परंपरेनुसार जुने बसस्थानक ते कृष्णा घाट या मार्गावरील आरक्षित शेतीच्या जमिनीवर भरवली जाते. सदर जागेवर ऊस आणि अन्य पिके असल्याने अडथळे निर्माण होत आहेत. समितीने शेतकऱ्यांना नोटीस पाठवून पिके न लावण्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे. सध्या काही जमिनी रिकाम्या असून, उर्वरित जमिनीवरील पिके गळीतासाठी जातील, याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळेल असे सांगितले.यावेळी प्रफुल्ल पाटील,धम्मपाल ढाले,शाहिर आवळे,अर्षद बागवान,अभय पाटूकले, असिफ घोरी,रामदास आवळे,बाळासाहेब मगदूम,राजू देवकाते,अल्ताफ बागवान आदी उपस्थित होते.