‘या’ गावातील खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय प्राधिकरण यांचे लागणार नाहरकत प्रमाणपत्र

जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये १० गावांचा समावेश आहे,असे असताना भूसंपादन विभागाच्या वतीने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घातल्याने खरेदी-विक्री करणाऱ्यांची प्रचंड गैरसोय करण्यात आली होती.यामुळे महामार्गातील बांधित १० गावांतील त्या गट नंबरवर निर्बंध घालण्याऐवजी बाधित नसलेल्या ८ गावांवरही खरेदी- विक्रीसाठी निर्बंध लादले होते.त्यामुळे दोन तालुक्यातील महामार्ग संपादन नसणा-या गावातील शेतक-यांना दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागणार होते.याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावर व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंधकरकर यांच्याशी पाठपुरावा करून आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारीत १० गावांचा सुधारीत निर्णय काढण्यात आला.
प्रशासनाने हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील चोकाक,अतिग्रे,माणगाववाडी,तारदाळ,मजले,हातकणंगले, दानोळी,कोथळी,जैनापूर,उमळवाड,उदगाव,तमदलगे, निमशिरगाव,चिपरी,कोंडिग्रे,नांदणी,धरणगुत्ती व जयसिंगपूर या १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचबरोबर या गावांतील खरेदी-विक्री करावयास झाल्यास प्रकल्प संचालक राष्ट्रीय प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडील नाहरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते.
आज झालेल्या नवीन आदेशानुसार कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये चोकाक,अतिग्रे,माणगाववाडी,मजले,हातकणंगले, जैनापूर,उमळवाड,उदगाव,तमदलगे,निमशिरगाव,या गावाचा समावेश करण्यात आलेला असून तारदाळ,चिपरी,कोंडिग्रे, नांदणी,धरणगुत्ती व जयसिंगपूर दानोळी व कोथळी ही गावे वगळण्यात आलेली आहेत.यामुळे वरील आठ गावातील खरेदी विक्री करिता आता राष्ट्रीय महामार्गाच्या परवानगीची गरज लागणार नाही.

Spread the love
error: Content is protected !!