कुरुंदवाडच्या संतप्त नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेचा पाणीपुरवठा केंद्राला ठोकलं टाळे
कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील महाराणा प्रताप चौकात सलगर-सदलगा राज्य महामार्गावर पाईपलाईनच्या लिकेजने अपघाताची मालिका सुरू होती.शुक्रवारी सकाळी पती-पत्नीचा अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर,अनुप मधाळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी कृष्णापाणी योजनेला पाणीपुरवठा बंद करून केंद्राला टाळे ठोकले.तब्बल चार तास पाणीपुरवठा खंडित होता.पाणीपुरवठा खंडित करताच इचलकरंजी प्रशासन खडबडून जागे झाले आणि आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे कोले,कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे,शाखा अभियंता बाजीराव कांबळेसह अधिकाऱ्यांची फौज थेट कुरुंदवाड गाठत आंदोलकांची समजूत काढून पाईप-लाईन लिकेजच्या कामाला सुरुवात केल्यानंतर आंदोलक शांत झाले.आणि केंद्राचे कुलूप काढून पाणी पुरवठा सुरू झाला.येथील चौकातील पाईपलाईनला गेल्या दीड महिन्यापासून लिकेज आहे.या दोन दिवसात लिकेज वाढले होते.ऊस हंगाम सुरू झाल्याने रस्त्यावर मळी पडली आहे.लिकेजचे पाण्याने वाहनांचे टायर ओले होऊन मळीने रस्ता निसरडा होऊन गुरुवार सकाळपासून 9 जणांचे अपघात झाले आहेत.आज शुक्रवारी सकाळी दांपत्यांची दुचाकी घसरून पडल्याने अपघात झाला त्यांना रुग्णालयात दाखल करून संतप्त नागरिकांनी आपला मोर्चा इचलकरंजी पाणी योजनेच्या केंद्राकडे वळवत कर्मचाऱ्यांना बाहेर काढून पुरवठा खंडित करून केंद्राला टाळे ठोकले.आयुक्त श्रीमती. शिंदे-कोले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी तात्काळ केंद्राजवळ आल्यानंतर मालवेकर आणि मधाळे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सूचना करूनही आपण याबाबत गांभीर्य घेतले नाही एखादी जीवितहानी झाल्यावर गांभीर्य घेणार होता का? असा सवाल उपस्थित करत कुरुंदवाड ते इचलकरंजी पर्यंत नूतन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील रस्त्यांची खुदाई केल्याने दैना झाली आहे.रस्त्यांचीही दुरुस्ती करावी अशी मागणी केली.आयुक्त श्रीमती शिंदे-कोले यांनी लिकेजची तात्काळ दुरुस्ती करून खुदाई केलेला रस्ता दगडीकरण करून डांबरीकरण करावे असा आदेश दिला. पाणीपुरवठा हे पवित्र काम आहे.मात्र माणसाचा जीव ही तितकाच महत्वाचा आहे. हाच हेतू ठेवून पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगत पुन्हा कुलूप खोलून पाणीपुरवठा सुरळीत केला.यावेळी धम्मपाल ढाले, आयुब पट्टेकरी,सूरज शिंगे,सुशांत संदी,विठ्ठल शिंगे, धैर्यशील ढाले,आदित्य कांबळे, ओंकार कडाळे, आदित्य बिंदगे, विनायक कडाळे, हर्ष कांबळे,शुभम मगदूम, ऋतिक हिमगिरे, लखन कांबळे, नरेश कुरणे,भैय्या ढाले,सुरज दिवटे आदी नागरिक आंदोलनात सहभागी होते.