शाहूवाडी / प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी पैकी पाटीलवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बोकड व एक पाळीव कुत्रे ठार
झाल्याची घटना घडली आहे.तुरुकवाडी पैकी पाटीलवाडी येथील शेतकरी संजय यशवंत माइंगडे,शंकर किसन फाळके,जयसिंगराव केशव पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने संजय माइंगडे व शंकर फाळके यांच्या बोकडावर हल्ला केला तर जयसिंगराव पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले.या घटनेची माहिती शाहुवाडी वन विभागाला कळताच वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला. शाहूवाडी तालुक्यातील वारणा परिसरात बिबट्याकडून होणाऱ्या सातत्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.