शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात कमालीची घट झाल्याने.6 आणि 7 तारखेला उपसाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने शासनाने उपसबंदी लागू केल्याने आता दुसरीकडे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडी पडली आहे. काही ठिकाणच्या पाण्याचे साठे वगळता तेरवाड बंधारा आणि नांदणी पुलापर्यंत नदीपात्र आटले आहे. या परिसरातील आडसाली लावणीचा ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
तर काही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राधानगरी धरणातून पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत असताना आता पाणी उपसा केल्याने अडचणीत भर पडली आहे.
ऑक्टोबर महिन्यात तेरवाड बंधारा शिरढोण पूल आणि नांदणी पुलाजवळ पूर्ण नदी कोरडी पडल्याने तळाचा खडक दिसू लागला होता. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.