खा.मानें समोर अडचणी तर शेट्टींसमोर अडथळे मतदारांसमोर तिसरा पर्याय कोण ?

संभाजी जाधव / धरणगुत्ती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेतून विद्यमान खासदार धैर्यशिल माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच मुख्य लढत होणार हे निश्चित आहे . ही प्रमुख लढत असली तरी या आजी माजी खासदारांच्या राजकिय अडचणी आणि अडथळ्यांची शर्यत हे दोघे कशी पार पाडतात ? यावरच मतदार तिसरा पर्याय निवडणार आहेत .

 

या दोघांनाही या वेळची निवडणूक सहज सोपी नाही . मानें समोर युतीच्या ;आणि शेट्टींसमोर स्वतंत्र लढण्याच्या भुमिकांमुळे अडचणी आणि अडथळे आहेत .गतवेळी शेट्टींच्या पराभवाची कारणे वेगळी होती  त्या कारणांनीच धैयशिल मानेंना सहज विजय मिळाला होता .

 

गत निवडणूकीत धैयशिल मानेंच्या विजयापेक्षा शेट्टींच्या पराभवासाठीच मोठी यंत्रणा लागली होती . केवळ त्याचा परिणाम म्हणून मानेंचा विजय मिळाल्याचे मानले जाते . वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या फुटीनंतर धैर्यशिल माने यांनी शिवसेनेच्या फुटीर गटात प्रवेश केला .

 

त्याबद्दलची मोठी नाराजी मुळचे शिवसैनिक आणि मतदारांत सध्या आहे .ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले म्हणून मतदार संघासाठी मोठा विकास निधी उपलब्ध झाला . काहीं प्रकल्प मंजूर झाले.इचलकरंजी महानगरपालीका आणि सुळकुड पाणियोजनेसारख्या योजनांना गती मिळाली.

 

मतदार संघातील सर्व गावांगावांत कमी जास्त निधी मिळाला .असे मानणाराही मोठा वर्ग आहे .मात्र खुद्द दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांच्या पासून माने घराण्यावर राजकिय निष्ठा ठेवून असणाऱ्यापैकी कांहींना धैर्यशील मानेंचा फुटीर गटात जाण्याचा निर्णय न पटल्याचे खाजगीत बोलताना जाणवत आहे.

 

तशात मुळच्या माने गटाशी त्यांचा संपर्क तुटल्याचा आरोप त्यांच्याच गटाकडून होत आहे .फुटीर शिवसेनेची संगत आणि त्यानिमित्ताने भाजपाशी जवळीक अनेक निष्ठावंतांना रुचलेली दिसत नाही.येत्या निवडणुकीत
महायुतीच्या राजकिय व्यवहारात धैर्यशिल मानेंच्या हातात कमळ आले तर या नाराजीत भर पडणार आहे.

 

सध्या त्यांच्या भोवती केवळ हितचिंतक म्हणून ठेकेदार ; प्रशासकिय अधिकारी ;आणि मोजके भांडवलदार घुटमळताना दिसतात.त्यात सामान्य माणूस दिसत नाही . किंवा त्याला त्यांच्यापर्यंत पोहचू दिले जात नाही.असा गंभिर आरोपही त्यांच्यावर त्यांच्या गटातूनच केला जात आहे .

 

येत्या लोकसभा निवडणूकीसाठी पुन्हा मैदानात उतरताना आशा अनेक अडचणी आणि नाराज कार्यकर्ते व निष्ठावंताची समजूत खास.माने कशी काढणार ? हे पहावे लागेल.गत निवडणूकीत सामान्य कार्यकर्त्याला ; शेतकऱ्यांना गृहीत धरून साखर कारखानदार ,भांडवलदार ; आणि ठेकेदारांच्या घोळक्यात घुटमळलेल्या राजू शेट्टींना त्यांच्याच पुर्वाश्रमी सहकारी मित्रांनी आणि शेतकऱ्यांनी राजकिय धडा शिकवला.

 

त्यातून बोध घेत यावेळी शेट्टींनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे . या घोषणेतून त्यांनी आपण सामान्य शेतकरी आणि सामान्यांच्या सोबतच असल्याचे चित्र उभे केले आहे.मात्र हातकणंगले सारखा सर्व बाबतीत बहुविविधता असणारा लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र म्हणून लढणे आणि जिंकणे हे तितकेसे सहज शक्य नाही.

 

कारण येथिल सहाही विधानसभा मतदार संघांचे प्रश्न वेगळे आहेत . शिरोळला दुरुस्त करायचे म्हटले तर शाहुवाडी बिघडते.आणि वाळव्याला गोंजारावे तर इचलकरंजीचे गणित चुकते.आशा किचकट मतदार संघात स्वतंत्र लढणे म्हणजे राजकिय आत्मघातच . त्यासाठी महायुती किंवा महाविकास आघाडीचा किमान छुपा पाठिंबा घ्यावा लागेल.

 

अन्यथा त्यांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय शोधावा लागेल.चालू गळीत हंगामाच्या सुरवातीला शेट्टींनी चालू पस्तीश्शे आणि मागिल चारशे ची मागणी करत मोठे आंदोलन केले.महामार्ग रोखला. त्यामुळे त्यांना आणि स्वाभिमानीला मोठी प्रसिद्धी मिळाली.मागणी पैकी उस उत्पादकांना प्रत्यक्षात मात्र तिन हजार ते तेहतिसशेच मिळत आहेत.

 

त्यामुळे आंदोलन झाले नसते तर किमान गळीत हंगाम लवकर सुरु होवून याच्या आसपासचा दर मिळालाच असता . शिवाय उसतोडी ; खोडवा ;निडव्याच्या मशागती एक महीन्यांनी पुढे गेल्या . ऊस वजन घटले .मागिल पैकी १०० आणि ५० देण्याचे ठरले. ते अजून अधांतरीच आहेत .

 

म्हणजे ताकतीने केलेल्या आंदोलनातून शेट्टींच्या प्रसिद्धी पलिकडे शेतकऱ्याचा हातात कांहीच पडले नाही . असा नाराजीचा सूर ऊस उत्पादकांत आहे.या आंदोलनात सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली.आंदोलनाला झालेली गर्दी ही सर्व कांही शेट्टींची समर्थक नव्हती.

 

मात्र आंदोलनाला मिळालेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठा होता . त्यावरून शेट्टींनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असेल तर हे राजकिय गणित जमेलच असे दिसत नाही . ऐनवेळी उमेदवारीसाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीत सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय झालाच तर राजू शेट्टींवर सत्तेसाठी स्वतंत्र लढण्याचा शब्द बदलल्याचा थेट आरोप होणार आहे.

 

 

हे सर्व अडथळे राजू शेट्टी कसे पार पाडतात ? यावरच त्यांची उमेदवारी आणि विजय अवलंबून आहे . या आजी माजी खासदारां ची उमेदवारी आणि विजयासाठी चाललेल्या प्रयत्नात मतदार या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी रहाणार ? कि ते तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराचा पर्याय निवडतात .याची उत्सुकता हातकणंले मतदार संघात आहे.

Spread the love
error: Content is protected !!