वाहतुकीचा शहरवासियांबरोबर प्रवाशांच्या डोक्याला ताप
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात होत असलेल्या वाहतुक कोंडीमुळे शहरातील नागरीकाबरोबर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे वाढती वाहतुक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहराला एकेरी मार्गाने वाहतूक होणाऱ्या रिंगरोडची अत्यंत गरज आहे. सध्या शहरातील प्रमुख मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.त्यामुळे या रस्त्यावरील ताण वाढू लागला आहे.महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातून होणारी अवजड वाहतुकीबरोबर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी नियमित भाविकांची ये – जा असते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून ये- जा करावी लागत आहे . सध्या ऊस वाहतुकीबरोबर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने शहरातील प्रमुख मार्ग धोक्याचा बनत आहे. त्यामुळे शहरातून एकेरी मार्ग करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे व अवजड वाहनांसाठी बाह्यमार्ग तयार करण्याची गरज बनली आहे.शिरोळ हे तालुक्याचे शहर असलेल्या शिरोळला वाहतुकीच्या समस्येला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हा तालुका सांगली जिल्हा व कर्नाटक सीमाभागाशी जोडला असल्याने दळणवळणासाठी शिरोळ शहर प्रमुख केंद्र ठरत आहे. तसेच तालुक्यातील नृसिंहवाडी, खिद्रापूर धार्मिक स्थळांमुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कर्नाटक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तालुक्यातून ऊस पाठविला जातो. त्यातच काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली असल्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.याचा परिणाम शिरोळ शहरातील वाहतुक कोंडीवर आहे. त्यातच अवजड वाहनांची वाहतुकही सुरुच असते. शहरातील अरुंद रस्ते त्यातून मोठ्या संख्येने येणारी वाहने यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे शहरातील जय भवानी चौकातून एकेरी मार्ग करावा अशी मागणी नागरिकांनी सातत्याने लावून धरली आहे पण नगरपरिषद व पोलीस आणि बांधकाम प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे एकेरी मार्गाने वाहतूक व्हावी याकरिता जयसिंगपूरहून येणारी वाहने जय भवानी चौक व्हाया बसवेश्वर चौक ते मटन मार्केट ते घालवाड फाटा या मार्गावरून तर नुसिंहवाडीकडून येणारी वाहने शिवाजी चौक व्हाया संभाजी चौक ते जय भवानी चौकातून पुढे जावीत असा शहरातून दोन एकेरी मार्गाचा प्रस्ताव नगरपालिकेने तयार करून सदरच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून मान्यता मिळवून शहरात होणारी वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे
सध्या सर्व प्रकारची वाहने शिरोळ शहरातील एकाच मार्गावरून जात असल्याने ध्वनिप्रदुषणाबरोबरच हवेचे प्रदुषण वाढून या मार्गावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी याठिकाणी छोटे-मोठे अपघातही घडले आहेत यामध्ये काहींचा बळी सुद्धा गेला आहे. शहरातील मुख्य मार्गावर शाळा, महाविद्यालये देखील आहेत. शहरात एकेरी मार्गाची अंमलबजावणी होत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. वेगाने वाढणाऱ्या शिरोळला एकेरी मार्गाबरोबरच बाह्यमार्गाची गरज आहे. पर्यायी मार्ग झाला तर वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
चौकट- तरच वाहतुक कोंडी सुटणार…
शिरोळ येथील दत्त कारखाना पहिला थांबा ते नंदिवाले वसाहत तेथून अर्जुनवाड रस्ता ते हाळ रस्ता पार करुन घालवाड, कनवाड, शिरटी असा मार्ग तर नृसिंहवाडी-जुना कुरुंदवाड रस्ता ते सोंडमळी मार्गाने नांदणी रस्ता तेथून आगर मार्ग असा रिंगरोड पर्यायाने होवू शकतो. रिंगरोड झाल्यास शिरोळमधील मुख्य मार्गावर वाहतुकीचा ताण कमी होवून कोंडी होणार नाही. त्यामुळे रिंगरोड गरजेचा आहे.
शिरोळ पोलिसांनी सुद्धा शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तात्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी शहरात वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले होते एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती तसेच एकेरी मार्गाचा फज्जा उडवणाऱ्या वाहनधारकांचे गुलाबपुष्प स्वागत करून शिरोळ शहर पत्रकार संघाने गांधीगिरीने आंदोलन केले होते तरीही एकेरी वाहतूक मार्गाचा प्रश्न सुटला नाही एकेरी मार्ग करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा शहरातील वाहतूक कोंडीमुळे कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे
चौकट-पालिकेचा पुढाकार हवा
शिरोळ शहरात होत असलेली गर्दी लक्षात घेवून शिरोळ पालिकेने यावर पर्याय म्हणून शिरोळ शहराला एकेरी वाहतूक करणारा मार्ग करण्याबरोबरच बाह्यमार्ग करण्यासाठी शासनाकडे प्रास्ताव सादर करण्याची गरज आहे. मात्र वाहतुकीची गंभीर परीस्थिती असताना पालिकेने अद्याप कोणतेही भुमिका घेतली नसल्याचे चित्र आहे.