दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट पाण्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात
शिरोळ / प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसात पंचगंगा नदीत अंत्यत रासायनिक व अँसिडयुक्त प्रदुषित व काळेकुट्ट पाणी येत असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ परीसरात पंचगंगा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडला आहे.त्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अशी गंभीर परीस्थिती असताना राज्यकर्त्यांच्याबरोबरच इचलकरंजी महापालिका व प्रदुषण विभागाने गांधारीची भुमिका घेतल्याने शिरोळ तालुक्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या पंचवीस वर्षापासून शिरोळ तालुकयात पंचगंगा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गांधीनगर पासून पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या औद्योगिक वसाहतमधील इचलकरंजी शहरातील प्रोससेचे रासायनयुक्त व अँसिडयुक्त विविध गावचे सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिळत असल्याने नदीचे पाणी काळेकुट्ट होवून पाणी प्रदुषित होते.परीणामी नदीतील माशासह सर्व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडतात. दुसरीकडे पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावात साथीचे आजार पसरत आहेत.वारवांर आंदोलने, निवेदने व शासनदरबारी प्रयत्न करूनही पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न निकालात निघत नसल्याने नागरीक हैराण झाले आहेत.इचलकरंजी पुढे असलेल्या शिरदवाड, अब्दुललाट,हेरवाड,तेरवाड,टाकवडे, शिरढोण,नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ,कुरुंदवाड, नृसिंहवाडी येथील गावाना सर्वाधिक पंचगंगा नदी प्रदुषणाचा फटका बसत आहे. सध्या या दुषित पाण्यामुळे शिरोळ बंधार्यात मृत माशांचा खच पंचगंगा नदीच्या पात्रात पडला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या कठावरील गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे राज्यकर्त्यांच्या बरोबरच इचलकरंजी महापालिका व प्रदुषण विभागाने पुर्णतः दुलर्क्ष केल्याने पंचगंगा काठावरील गावात साथीच्या आजाराना बळ मिळत आहे. तात्काळ पंचांगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.