इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील पंचगंगा नदी पात्रात वाढत चाललेली जलपर्णी काढण्यासाठी माणुसकी फौंडेशनसरसावली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी मागील तीन दिवसापासुन मोहीम हाती घेतली आहे. या कामात शहरातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माणुसकी फौंडेशनच्या वतीने
करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून भेडसावणारा जलपर्णी (केंदाळ) चा प्रश्न यंदा पुन्हा भेडसावू लागला आहे. थंडीच्या शेवटी व उन्हाळ्याच्या पूर्वी हा प्रश्न जटील बनतो.गेल्या वर्षी माणुसकी फौंडेशनने सलग 92 दिवस मोहीम घेतली होती. त्यामध्ये सुमारे 4 हजारपेक्षा अधिक ट्रॉली केंदाळ काढण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची चांगली मदत झाली होती.
आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सहकार्याने तीन दिवसापासून केंदाळ काढायचे काम चालू आहे. यामध्ये महापालिकेचे सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचे व त्यांच्या टीमचे सहकार्य मिळत आहे.आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेने नदी शुद्ध व केंदाळ मुक्त होणे गरजेचे आहे.
यासाठी गावातील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते यांचा सहभाग महत्वाचा आहे.त्यामुळे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे यांनी केले आहे.