शिरोळ / प्रतिनिधी
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे.महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे सी-व्होटरच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.मात्र विरोधकांची एकजूट नसणे हे देखील भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सहा जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.शेट्टी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या स्वबळाचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा यावर राजकीय आखाडे रंगत आहेत.सद्या महायुती व ‘इंडिया’ या आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच शेट्टी यांनी स्वबळाचा नारा देत राज्यात सहा जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथून लोकवर्गणीतून निवडणूक लढली आणि जिंकली होती.आता ते त्यांच्या पारंपरिक मतदारसंघासह कोल्हापूर,सांगली,माढा,विदर्भातील बुलढाणा आणि मराठवाड्यातील परभणी या सहा मतदारसंघातून उमेदवार देणार आहेत.राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी सोबत काम केलेले आहे.त्यामुळे दोन्हींचा अनुभव वाईट असल्याचे सांगत त्यांनी स्वबळाचा नारा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.