कागल / प्रतिनिधी
गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे.यापुढे गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आणि पुण्याई आहे.पेन्शन दोन हजार रुपये होईपर्यंत पाठपुरावा करत राहू असे अभिवचन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप प्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र इंगळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून केडीसीसी बँकेचे संचालक व कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने उपस्थित होते.मुश्रीफ पुढे म्हणाले समाजातील विधवा,परित्यक्त्या,दिव्यांग यांचे डोंगराएवढे दुःख असते.वृद्ध माणसे ज्यांना मुले -सुना बघत नाहीत,त्यांची परवड तर अत्यंत वेदनादायक असते.या सगळ्यांच्या चरितार्थासाठी ही पेन्शन उपयोगी पडते. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये “निराधारांना नियमितपणे दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्या,”अशी आग्रही मागणी केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन ही पेन्शन दरमहा दीड हजार करण्याचा निर्णय घेतला आहे.पेन्शन दोन हजार रुपये होईपर्यंत पाठपुरावा करीतच राहू.स्वागत व प्रास्ताविक केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आनुरचे सरपंच काकासाहेब सावडकर,राजेंद्र माने, नेताजी मोरे,जोतीराम मुसळे आदी प्रमुख उपस्थित होते.