इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील रेशन धान्य दुकानातून आणलेला गहू खाल्ल्याने दोन बोकडांचा मृत्यू झाल्याची अजब घटना येथील कृष्णानगर येथे घडली आहे.या गहूमध्ये युरियासदृश्य
रासायनिक पदार्थ मिसळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान,संबंधित दुकानदाराने सदरचे धान्य परत आणून देण्याचे आवाहन केले होते.मात्र हा नागरिकांच्या
जिवीताशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगत बोकड मालक मेहबूब मुजावर यांनी थेट शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या खळबळजनक घटनेने स्वस्त धान्य दुकानात मिळणार्या धान्यात युरिया आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या संदर्भात
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, मेहबूब आबालाल मुजावर हे कल्पवृक्ष कॉलनीत असलेल्या रेशन दुकानातून धान्य आणले होते.त्यातील गहू मुजावर यांनी घरासमोरच दारात वाळण्यासाठी पसरून ठेवला होता.
दरम्यान मुजावर यांच्याच मालकीची सहा महिन्याची दोन बोकडांनी हा वाळत घातलेला गहू खाल्ला.त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटातच दोन्ही बोकडे तडफडू लागली. बोकडांची अशी अवस्था पाहून मुजावर यांनी तात्काळ जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून घेतले.
मात्र डॉक्टर येण्यापूर्वीच दोन्ही बोकडांचा मृत्यू झाला होता.डॉक्टरांनी बोकडांनी खाल्लेल्या गहूचे निरीक्षण केले असता त्यामध्ये त्यांना युरियासदृश्य रासायनिक पदार्थ आढळून आले.त्यावरून त्यांनी युरिया मिश्रित गहू खाल्ल्याने बोकडांचा मृत्यू झाल्याचे अंदाज व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर मेहबूब मुजावर व नातेवाईकांनी संबंधित रेशन दुकानदाराला बोलवून घटनेची माहिती दिली.त्यावर दुकानदाराने वरूनच धान्य आले असून ही घटना वरिष्ठ कार्यालयास कळवितो असे सांगितले.मात्र या घटनेने
मुजावर कुटुंबाचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तसेच कोल्हापूरातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.