सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात आंतरराज्य वाहतूक वाढावी ,लोकांना प्रवासासाठी अनुकूल व्हावे,या उद्देशाने चिकोडी- शिरोळ या दोन तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दत्तवाड पूल अनेक वर्षां पूर्वी बांधून पूर्ण झाला असून, तो सध्या असून अडचण नसून खोळांबा या स्थितीत आहे.कोट्यावधी रुपये खर्च करून आंतरराज्य वाहतूक वाढावी लोकांचे येणे जाणे वाढावे,व्यापार वाढावा,महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या देवाण-घेवान व्हावी,या उदात्त हेतूने बांधलेला हा पूल वाहतुकीस अनुकूल नसल्याने आता उदास अवस्थेत दूधगंगा नदीवर उभा आहे. या मार्गावरून अनेक वर्षापासून कर्नाटक व महाराष्ट्रातील एकही बस जात नाही. व कर्नाटकात येत नाही, याला एकमेव कारण म्हणजे दत्तवाड गावातील रस्ता.दत्तवाड गावातील हा रस्ता फारच अरुंद असून बस वाहतुकीसाठी तो योग्य नसल्याने व जुन्या बस स्थानकावर आठवडी बाजार भरत असल्याने दत्तवाड गावातून कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही बसेसना जाणे- येणे अवघड होऊन बसले आहे.दत्तवाड ग्रामपंचायतने गावाच्या बाहेरून बायपास रस्ता उपलब्ध करून दिल्यास आंतरराज्य वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर होऊन निपाणी- सांगली,चिकोडी-जयसिंगपूर या भागातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत सोयीचे होणार आहे.परंतु या सर्व मार्गावर एकच अडसर म्हणजे दत्तवाड गावातील अत्यंत अरुंद असलेला रस्ता,सदलगा शहरातून येणारा रस्ता दत्तवाड गावच्या बाहेरून काढून दिल्यास सर्व वाहतूक सुरळीत होईल व सीमा भागातील लोकांचा प्रवास देखील सुखकर व वेळेची बचत होऊन कोट्यावधी रुपये खर्च करून उभा केलेल्या पुलाचा सदुपयोग होईल,या दृष्टीने दत्तवाड ग्रामपंचायतीने जनतेला विश्वासात घेऊन पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्यास सीमा भागातील महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्यातील प्रवाशांना प्रवास करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.आणि दत्तवाड गावाचे महत्त्व देखील फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल मात्र सध्या वाहतुकी विना असून अडचण नसून खुळांबा या स्थितीत तसाच उभा आहे. यासाठी दत्तवाड गावातील सुजाण नागरिकांनी पर्यायी रस्ता काढणे आज काळाची गरज आहे. त्यामुळे सीमा भागातील लाखो प्रवाशांचे हाल वाचणार आहेत. सदलगा दत्तवाड शिरोळ या मार्गावरून प्रवास होत नसल्याने आता सध्या सर्व बसेस चिकोडी -बोरगाव- इचलकरंजी, निपाणी- बोरगाव- सांगली, या मार्गावरून धावत आहेत, परिणामी सदलगा दत्तवाड कुरुंदवाड हा भाग बस वाहतुकी विना उपेक्षितच राहिला आहे.
निपाणी- सदलगा- सांगली,
चिकोडी- सदलगा- जयसिंगपूर
व्हाया दत्तवाड पूल हा मार्ग मात्र आता सध्या पूर्णपणे इतिहास जमा झालेला आहे.
तरी लोकप्रतिनिधी ,जनतेचे शासन नियुक्त प्रतिनिधी, प्रवासी व दत्तवाड जनतेने सहकार्य करून दत्तवाड गावातून किंवा गावाबाहेरून योग्य पर्यायी वाहतूक निर्माण करून दिल्यास सर्वांना सोयीचे होईल. सीमा भागातील हा जवळचा मार्ग लवकरच कार्यान्वित व्हावा अशी सदिच्छा सीमा भागातील प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.