आजी माजी सैनिकांसह जवानाच्या कुटुंबियांची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान दरम्यान ७ मेपासून निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने देशभरातील सर्व सुरक्षा दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना तातडीने सेवेत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.मात्र या जवानांना त्यांच्या गावी किंवा सेवा ठिकाणी परतताना रेल्वे तिकीट मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष संजय माने आणि सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय इंगळे यांनी आज नाराजी व्यक्त करत केंद्र सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. युद्धसदृश्य परिस्थितीत देशाच्या सेवेसाठी निघालेल्या जवानांना रेल्वे प्रवासात विशेष सवलत व सुविधा देणे आवश्यक आहे,असे दोघांनी स्पष्ट केले.त्यांच्या मते,रेल्वे मंत्रालयाने या जवानांसाठी स्वतंत्र बोगी लावावी जेणेकरून दोन-तीन दिवसांचा प्रवास अधिक सुसह्य होईल.तसेच स्थानिक खासदार व आमदारांच्या राखीव कोट्यातून या जवानांना तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. देशासाठी आपले प्राण अर्पण करण्यास सज्ज असलेल्या जवानांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी सरकार व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आजी माजी सैनिकांसह जवानाच्या कुटुंबियांकडून होत आहे.